मनोगत
डॉ. हेमंत देवस्थळी
संस्थापक-अध्यक्ष, आनंदयात्रा
आनंद्यात्रेच्या ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त 'आनंदयात्रा' वार्षिकाच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन होत आहे ही मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. केवळ 'एकटेपणा' या विषयाची चर्चा करणारे दुसरे कोणते नियतकालिक आपल्याकडे असेल असे वाटत नाही. स्वतःचं मन जिच्यापाशी निसःन्कोच मोकळं करावं अशी एकही व्यक्ती जेव्हा आयुष्यात उरत नाही तेव्हा माणसाच्या आयुष्यात एकटेपणा निर्माण होतो असं म्हणता येईल. असं एकटेपण ही आयुष्यातील एक अतिशय भयावह घटना असते याबद्दल क्वचितच दुमत होईल.दुर्दैवानं हा एकटेपणाचा अनुभव भविष्यात अधिक तीव्र होईल अशी चिन्हं आहेत.
या प्रश्नाची विविधांगाने चर्चा व्हावी,त्यात रूढार्थाने एकाकी असलेल्या आणि नसलेल्या अशा दोघांचाही समावेश असावा, तसेच केवळ जोडीदाराच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या एकटेपणाची नव्हे तर जिवलग मित्र-मैत्रीण, आप्त, अपत्य यांच्या निधनामुळे वा दूर जाण्यामुळे जे एकटेपण येते त्याचीही चर्चा व्हावी अशा व्यापक भूमिकेतून 'आनंदयात्रा' हे प्रकाशन सुरु करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी या उपक्रमाला सुरवात झाली. या वर्षी या उपक्रमाला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता तो अधिक जोमदार व सकस झाला आहे असं म्हणता येईल. मला वाटतं एकटेपणाची झळ पोचलेल्यांच्या मनात धुमसत असणाऱ्या अव्यक्त भावनांना 'आनंदयात्रा' या प्रकाशनामुळे व्यासपीठ मिळालं आहे असं म्हणायला हरकत नाही.
या अंकासाठी आनंद्यात्रेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. उद्धव घारपुरे यांनी खूप श्रम घेतले आहेत. तसेच जाहिरातदार व प्रायोजक यांच्या सहकार्याने या उपक्रमासाठी आर्थिक सुलभता निर्माण झाली. त्यांचे असेच सहकार्य , विशेषतः ५ व्या वर्षाच्या सांगता कार्यक्रम व 'आनंदयात्रा' अंकालाही, मिळो अशी भावना व्यक्त करून हे मनोगत संपवतो.

No comments:
Post a Comment